Friday, June 3, 2011

आंबेडकरी साहित्य (Ambedkarite Literature)


- आंबेडकरी साहित्य म्हणजे आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तित्व - कर्तृत्व आणि तत्त्वज्ञान यांच्या प्रेरणाभावातून आंबेडकरी साहित्य उर्जवान होते. मानवमुक्तीसाठीची जनआंदोलने आणि आंबेडकरी साहित्य हे परस्पर पूरक अथवा परस्पर सापेक्षच नव्हे तर ते अभिन्न आहेत. एकमय आहेत.

जगाची समताधिष्ठित पुन:रचना, मानवी स्वातंत्र्याचे समर्थन आणि बंधुभावयुक्त मानवी संबंधांवर आधारित मानवी समाजाचे निर्माण हे आंबेडकरी साहित्याचे प्रयोजन आहे. समता - स्वातंत्र्य- बंधुभाव ही तत्त्वत्रयी परस्पर पूरक आणि परस्पर संमिलीत मानणे व तिचा पुरस्कार करणे हा आंबेडकरी साहित्याचा सत्त्वभाव आहे.
नैसर्गिक हक्क नाकारलेल्या अर्थावंचित व्यक्ती व व्यक्ती-समूहांना त्यांचे मानवी हक्क व सत्त्व प्राप्त व्हावे यासाठी मुक्ती लढ्याचा उदघोष करणे हे आंबेडकरी साहित्याचे ध्येय आहे या अर्थाने आंबेडकरी साहित्य हे मानवमुक्तीच्या ' चळवळीचे साहित्य ' Literature of Libaration ' आहे म्हणून कलात्मकता आणि सामाजिकता यांच्या समतोलाचे सौंदर्य त्यातून प्रतीत होते.
व्यक्तिगत संवेदनविश्व आणि सम्यक तत्त्वदर्शन यांच्या गुणणातून (multiplication) साहित्यिकाचे व्यक्तित्त्व घडते. तेच साहित्यकृतीतून प्रस्पुरीत होते म्हणून आंबेडकरी साहित्य हे तत्त्वभावात्मक साहित्य आहे.
व्यक्तीचे संवेदनविश्व प्रभावित करणारी परिस्थिती विद्रूप असेल आणि / किंवा व्यक्तीमात्रांजवळ तत्त्वज्ञानाचा अभाव असेल अथवा चुकीचे तत्त्वदर्शन तो धारण करीत असेल तर त्याचे जीवनाविष्कार सर्जनशील ठरत नाही. त्याला या दु:खस्थितीतून मुक्त व्हावे लागते... जेव्हा गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली जाते आणि तो बंड करतो तेथेच मुक्तीलढे प्रारंभ होतात. मुक्तीची अनुभूती सुंदर असते. मुक्तीचे सौंदर्य हेच खरे सौंदर्य. मुक्तीलढा हा सर्जनाचा उत्कट आविष्कार असतो. व्यक्तिविशिष्ट आणि समूह पातळीवर तो सर्जनशील निर्मितीचे नवे प्रतीत्य समुत्पन्न आविष्कार घडवीत राहतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला त्याच्या दलितत्त्वाचे कारण सांगितले. कार्यकारणभावाचे अन्वेषण करण्याची प्रतिभा दिली मुक्तीचे मार्ग सांगितले. मुक्त होऊन मानवाचे पुनरुत्थान करण्याचे ध्येय दिले. या ध्येयातूनच आंबेडकरी क्रांतिकारी तत्त्वज्ञानाचा मूल्यव्यूह तयार झाला हा मूल्यव्यूहच आंबेडकरी साहित्याचे प्राणतत्त्व होय.
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी दलीतत्त्व विसर्जित करून ज्यांनी लोकविदू बुध्दाचा बुध्दिप्रमाण्यावादी मूल्यविचार स्वीकारला त्यांची जीवनमूल्ये नीतीमूल्ये व सौंदर्यमूल्ये बदलली त्यांचे प्रतिभा आविष्कार अनन्यपणे नवेच होते.' जीर्ण मूल्यांची घोंगडी फेकून देऊन नवी निळी शाल पांघरा"--- असे त्या स्थितीचे वर्णन महाकवी वामनदादा यांनी तेव्हा केले होते. १९९३ च्या वर्धा येथील पहिल्या अ. भा. आंबेडकरी साहित्य संमेलनात आपल्या अध्यक्षीय भाषणात लिहिले होते --- '' जीवनात श्रेष्ठ आदर्श कोणता यांची मांडणी आंबेडकरी तत्त्वज्ञान करते. आंबेडकर हे आता एका व्यक्तीचे नाव राहिलेले नाही, ते आता एका विचारधारेचे नाव झालेले आहे. आणि आमच्या लिहिण्याची प्रेरणा तर आंबेडकरीच आहे. म्हणून आपल्या या साहित्याला 'दलित ' साहित्या ऐवजी 'आंबेडकरी साहित्य' संबोधावे असा विचार अनेक वर्षापासून सुरु आहे. आंबेडकर जन्मशताब्दीपासून म्हणजे गेल्या दोन - तीन वर्षापासून हा समूह विचार बनत चालला आहे. आता शाब्दिक अवडंबर आणि वैचारिक गोंधळ नको आहे. या साहित्य संमेलनाच्या आयोजनामुळे आपण या वळणावर येऊन पोहचलो की, यापुढे आमचे साहित्य हे ' आंबेडकरी ' या नावानेच ओळखले जाणार आहे.
' दलित ' या शब्दात मनाच्या कोपऱ्यात विषमतावादी हिंदुत्व जोपासण्याची व कधी कधी मार्क्सवादी म्हणवून क्रांतिकारी समजून घेण्याची जी सोय होती ती यापुढे "आंबेडकरी" या शब्दात राहणार नाही. आंबेडकरी म्हणजे तथागाताचा जीवनमार्ग स्वीकारणारा, फुल्यांच्या सामाजिक, धार्मिक विचाराचे विश्लेषण करणारा आणि अखिल मानवी समता मूल्यावर आढळ विश्वास बाळगणारा माणूस होय.
आंबेडकरी साहित्यातील कथा, कवितेला हे भान ठेवावे लागणार आहे. आंबेडकरी साहित्य म्हणजे दलित साहित्याच्या निर्मितीचा पुढील विकास टप्पा होय.
'दलीतत्त्व' हे हिंदुत्व सापेक्ष असते. क्रमबद्ध विषमतेची इतकी अमानुष नकारात्मक मनोवस्था काळाच्या कुठल्याही टप्प्यावर अन्यत्र आढळत नाही. भारतातून बुद्धविचारांचा ऱ्हास झाल्यानंतर मध्ययुगीन कालखंडात केव्हा तरी बुद्धिप्रामाण्यवाद बहिष्कृत केला गेला. त्यातून दलितत्त्व लादले गेले. दलितत्त्व ही मनोवस्था आहे. तिचे नेहमी वर्ण-व्यवस्थेतील अन्य वर्ण-जातींशी द्वंद्वात्मक संबंध राहणार ! अर्थात जोपर्यंत दलितत्त्व राहील तोपर्यंत धर्मकलह राहील आणि त्यातून कोणतेही सर्जन घडणार नाही. म्हणून राष्ट्रहीत आणि दलितत्त्वाचा विलय होणे अपरिहार्य आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ही द्वंद्वात्मकता संपविण्यासाठी बुद्धाविचाराची ' नवी नैतिकता ' स्वीकारली. ज्यांनी ही नवी नैतिकता स्वीकारून नव्या सामाजमूल्यांचे - समष्टीशी बांधीलकीचे वाड:मयीन ध्येय स्वीकारले त्यांचे साहित्य सर्जनशील झाले.
- भीम-गीतकारांनी आपल्या गीतातून आंबेडकरी प्रेरणा प्रथमत: संप्रेषित केली. आंबेडकरी चळवळीत त्यांचे योगदान अनन्य महत्त्वाचे आहे. स्वत:ला दलित साहित्यिक म्हणवून घेण्याची आवश्यकता त्यांना वाटली नाही.
- दलित मुक्तीसाहित्याची प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे अभिजनांना कळले नाही. त्यांनी जनतेच्या मुक्तीसाहित्याला दलितसाहित्य संबोधीले ! स्वत्वशोध न घेता इतरांनी दिलेले हे संबोधन स्वीकारणे आंबेडकरी साहित्याने नाकारले. विभावरी/श्री.म. माटे/शरच्चंद्र मुक्तिबोध/ मुल्कराज आनंद / अमृतलाल नागर / यांच्या काही साहित्यकृतीतून मानुष जाणिवा व्यक्त होतात. म्हणून त्यांना दलित साहित्यिक म्हणविणे जमत नाही. ज्यांना दलितत्त्व भारताचे रूपक वाटते त्यानाही ते स्वत; प्रत लावून घेणे साहणार नाही. कुणीतरी दलित असेपर्यंतच आपण उच्च राहू शकतो, हे जाणणारी माणसे दलितत्त्वाचे उदात्तीकरण करतात - हे अज्ञान की कौटिल्य !
- 'शोषणाचा, गुलामीचा संदर्भ ज्या साहित्याला असेल आणि त्यातून मुक्तीची जाणीव आंबेडकरी प्रेरणेने झाली असेल असे जगातील कोणतेही साहित्य आंबेडकरी साहित्य आहे'. म. भ. चिटणीस, भदंत आनंद कौसल्यायन, रूपा बोधी, माईसाहेब आंबेडकर, यांचे साहित्य आंबेडकरी साहित्यच ठरावे. तसेच जगभर आंबेडकरवादाची उर्जा घेऊन लढणारे साहित्यिक आंबेडकरी साहित्याची निर्मिती करतील.
- मिलिंद साहित्य सभा, अस्मितादर्श, सिंहगर्जना, समुचित , निकाय, या विचारपीठांतून आंबेडकरी साहित्य साकारत गेले. नामदेव ढासळ, राजा ढाले, बाबुराव बागूल, यशवंत मनोहर, यांनी आंबेडकरी साहित्याला युगसाहित्य ठरविले. आता नव्या ई-युगात आंबेडकरी साहित्यच जागतिक साहित्याचे वैचारिक नेतृत्व करेल .....याचे भान आंबेडकरी साहित्यिकांनी बाळगून साहित्य निर्मिती केली पाहिजे....
( http://ambedkarisahityaparishad.yolasite.com वरून साभार )

Make a free website with

Thursday, June 2, 2011

नात : पावसाच नि माझ


आभाळाची फाटली कूस
आला पाऊस, आला पाऊस

तस या पावसाच नी माझ
दरवर्षीचच नात
आभाळ भरून येताच
हृदयात घरघरते जात
भोकाळलेल्या झोपडीला
हाताने झाकताही येत नाही
आणि वादळाच्या धाकाने बाहेर
पळताही येत नाही

पाऊस घेऊन येते मरण
पाऊस पेरून जाते जीवन
पाऊस ठेवते गर्भार धरणी
पाऊस पळवते तोंडच पाणी

तापत्या मातीवर पूस पडताच
गंध मोहरून येते
माझी वस्ती पावसात भिजते
तेव्हा डोळे भरून येते
डोळ्यातल्या डोळ्यात आटते पाणी
अस पावसाच मन आहे कोळंश्यावणी

Sunday, January 9, 2011

एक पत्र - व्यवहार : ज्यातून एक जबाबदारी पेलायची जाणीव झाली




वर्धा : भारतातल्या महाराष्ट्र राज्यातील अस एक गाव ज्या गावाला बौद्ध तत्त्वज्ञ धम्मानंद कोसंबींच्या निर्वाण भूमीचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे, त्याच गावात १९९३ साली महाकवी वामनदादांच्या अध्यक्षतेखाली पहिले आंबेडकरी साहित्य संमेलन संपन्न झाले आणि ' आंबेडकरी साहित्य ' ही संज्ञा पुढे आली. आज या घटनेला दीड दशक पूर्ण होत आहे. त्या दरम्यान तीन अ. भा. आंबेडकरी साहित्य संमेलने या शहराने आयोजित केली. त्यानंतर हे तिसरे आंबेडकरी युवा साहित्य संमेलन या शहराने आयोजित केले. त्याच्या अध्यक्ष पदाच्या संदर्भात झालेला हा ई- मेल व्यवहार

To,
Prof. Sateshwar Morey
Amravati
Subject - Invitation for 3rd Ambedkari Yuwa Sahitya Sammelan
Reference - 2nd Ambedkari Yuwa Sahitya Sammelan, Yavatmal .
Sir,
we the Ambedkari Sahitya Parishad are very happy to inform you that we are conducting 3rd Ambedkari Yuwa Sahitya Sammelan in Wardha on 2nd jan 2011। As you know, we have already decided that you have to preside over the Sammelan and I have already discussed with the other members of the Sanwardhan Mandal and everybody delighted with your name and given approval
Officially, president & secretary of the Mandal may not have given you official letter, they should have given, but they are ringing you continuously regarding your presiding। I think we all are responsible for this telephone process because since the mandal established and Amravati sammelan was over we didn’t took any meeting regarding establishment of mandal. All the procedures and the discussions of the mandal we shared telephonically, it means we have recocknize telephone is official part. At this time also president and secretary are doing the same. I think this is the technical point but important is the emotions of all members who have given consent and they are very delighted with your name.
Having discussion with Mandal officers, being a cashier of Mandal, president of the Ambedkari Sahitya Parishad and organizer of the 3rd yuwa sammelan, on behalf of all these things, I am conveying you the decision that you have been elected to preside over the 3rd Ambedkari Yuwa Sahitya Sammelan. Actually we have started the preparation with your name and nothing can do at this stage.
We the Wardhawasi have a lack of writers and speakers so don’t understand that what we have to write and what not, but our emotions are true and very transparent. If any thing gone wrong here, I apologize that.
Finally, we hope that you will consider this as an invitation and will convey the positive consent to president and secretary of mandal either telephonically or by any medium which you decide.
Thank you and JAY BHIM.
Yours,
Arvind Nikose
अर्थात, हा ई-मेल अनपेक्षित नव्हता त्याचा तगादा गेल्या वर्षभरापासूनच सुरु होता. काही जबाबदरया माणसाची इच्छा असो वा नसो त्या सामाजिक दायित्व म्हणून स्वीकाराव्याच लागतात.

मा. अरविंदजी,
सस्नेह जयभीम
आपण दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करताना जेवढा आनंद व्हायला हवा होता तेवढा तो होत नाही. गेल्या वर्षभरापासून आपण करीत असलेला हा आग्रह आणि वर्धेकरांशी असणारा अत्यंत घनिष्ट कौटोम्बिक संबंध यामुळे हे निमंत्रण टाळता येणार नाही याची मला तीव्र जाणीव आहे.
मुळात आपण सर्व एकाच कुटुंबातले, हे कुटुंब साकारताना किती कष्ट पडतात हे आपण सगळे जाणताच या सगळ्या प्रकरणात हे कुटुंब बाधित होऊ नये किंवा कुठलाही गैरसमज निर्माण होऊ नये असे मनापासून वाटते. हा या कुटुंबातल्या माणसांनी केलेला सन्मान आहे. एकमेकाबद्दल असलेल्या आपुलकीतून तो माझ्या वाट्याला आला आहे. ही माझ्या पाठीवरची थापही नाही; किंवा माझ्या कर्तुत्वाचा गौरव पण नाही, ही एक जबाबदारी आहे. ती मला पेलते किंवा नाही याचा कोणताही विचार न करता मी ती स्वीकारत आहे. अर्थात, आपला मझ्यावर अतिरेकी असणारा विश्वास आणि चळवळीवर असणारी निष्टा यामुळे ही जबाबदारी देखील हलकी वाटेल याबद्दल कुठलीही शंका नाही.
काय आहे अरविंदराव! आपण सगळेच या सगळ्या मान - सन्मानाच्या पल्याड गेलेली माणस आहोत, आपण असे आहोत, म्हणूनच या वास्तवात टिकून आहोत. हेच जर आपल्यातून निघून गेल तर?
अर्थात, या वास्तवात टिकण्याच्या किंवा न टिकण्याच्या भीतीपोटी मी बोलत नाही, तर या पद्धतीने काम करणारी; आणि समाजाचा विश्वास संपादन केलेली मंडळी आज कुठेच दिसत नाही; आणि अशा आपल्या भावनिक वर्तनातून आपणही बाद झालो तर, आपल्या व्यक्तिगत हानीपेक्षा जी सामाजिक हानी होणार आहे, ती फार मोठी असणार आहे,
कोणत्याही माणसाला मन असते आणि तेच आपल्या समजण्याच्या पलीकडे असते. म्हणून सगळेच वांदे आहेत .असो जे काय असेल किंवा होईल ते आताच सांगता येणार नसले तरी आपण मात्र याचे भान ठेवले पाहिजे असे मला वाटते. असो आपण सगळे मिळून या संमेलनाला ऐतिहासिक बनवण्याचा प्रयत्न करू या! आभार कसले मानायचे ? आपल्या अर्थात वर्धेकारांच्या मनातल्या आपुलकीपेक्षा ते मोठे नाही. बस ती टिकावी अधिक वृद्धिंगत व्हावी एवढीच विनम्र अपेक्षा! आंबेडकारी साहित्य परिषदेच्या सर्वाना जयभीम!
सतेश्वर मोरे

Monday, October 4, 2010

मी त्या माणसाच्या शोधात आहे!



माणसाचं मोठेपण कशात असते? त्याने स्वीकारलेला तत्त्वाप्रती असलेल्या प्रामाणिक निष्ठेत? की त्याने केलेल्या तडजोडीत? मुळात हे प्रश्न तेव्हाच पुढे येतात, जेव्हा एखादा माणूस आपली एखाद्या तत्त्वाप्रती आपली बांधिलकी जाहीर करतो. ज्यांचे या बांधिलकीशी काहीही देणे घेणे नसते त्यांच्या संदर्भात असले प्रश्न उभे होत नाहीत. जे लोक बांधिलकीशी आपले नाते सांगतात त्यांना या प्रश्नांना टाळून पुढे जाताच येत नाही. पद, पैसा आणि पुरस्कार याने माणूस मोठा होत नाही. हे वास्तव प्रज्ञावत माणूस जाणतो म्हणूनच तो यापेक्षा आपल्या निष्ठेला अधिक महत्त्व देतो नुकतेच आंबेडकरी अर्थतज्ञ आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी नुकताच काँग्रेस प्रवेश केला आणि ह्या सगळ्या प्रश्नांना रान मोकळे झाले.
मुळात ज्या समाजवास्तवात डॉ मुणगेकरांनी स्वताला उभारले त्या समाजवास्तवात ज्या परिवर्तनाच्या चळवळी झाल्यात त्यातल्या निष्टावंत गणल्या जाणाऱ्यां एका चळवळीचे डॉ . मुणगेकर सक्रीय कार्यकर्ते होते. ही चळवळ कॉंग्रेस विरोधी होती. त्याही पुढे जावून आंबेडकरी अर्थतज्ञ म्हणून ज्याची संबंध जगभर ख्याती आहे त्याना केवळ आपले राज्यसभा सदस्यत्व कायम ठेवण्यासाठी कॉंग्रेसला आपल्या विश्वासाचा दाखला देण्यासाठी पक्ष प्रवेशासारखा निर्णय घ्यावा लागला. हा कॉंग्रेसने त्यांच्यावर दाखवलेला अविश्वास असेलही कदाचित पण यासाठी त्याना त्यांच्या वैचारिक निष्ठेचे बलिदान देण्याची का गरज वाटावी? हाच प्रश्न पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्याना पडला आहे.
ज्या सामाजिक परिप्रेक्षात वैचारिक क्षेत्र, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रापेक्षा श्रेष्ठ समजले जाते. तिथे वैचारिक क्षेत्रातली मंडळी राजकीय क्षेत्रालाच प्राधान्य द्यायला लागली तर त्यातून दोन प्रश्न निर्माण होतात. एक: ज्या वैचारिक क्षेत्रात या मंडळींचा वावर आहे त्या क्षेत्राची मौलिकता संपुष्टात आली आहे काय? आणि दुसरे असे की, या क्षेत्रात वावरणाऱ्या माणसांच्या निष्टा प्रामाणिक नाहीत काय? आज किमान या प्रश्नानाची उत्तरे समाजाला शोधावीच लागेल कारण मुणगेकर हे एकटे नाहीत यापूर्वीही असे प्रकार घडले नाहीत असे नाही. थोड्याफार फरकाने अशा घटना वैचारिक क्षेत्रातील मंडळींच्या संदर्भात घडल्या आहेत. मुणगेकर यांच्यामुळे ही घटना उजेडात आली एवढेच!
ज्यावेळी डॉ. मुणगेकर याना राष्ट्रपती नामनिर्देशित संसद सदस्यत्व बहाल कण्यात आले त्या वेळी कॉग्रेसने दाखवलेली तटस्थता आणि स्पष्टता किती तकलादू होती. हे आता अगदी थोड्याच अवधीत सिद्ध झाले आहे. पदाने अथवा पैशाने माणसे वाकवण्याची त्यांची जुनीच नीती आताही त्याच पद्धतीने सुरुच आहे. निष्ठावंत प्रतिष्ठीत माणसाना आमिषे द्यायची . आमिषांना बळी पडलेली माणस आपल्या माणसांपासून तोडायची आणि हतबल करून सोडून द्यायची. मग त्यांचा रुपवते होतो, भंडारे होतो, आठवले होतो, ही यादी आणखी वाढवता येईंल. कोणीही सर्वज्ञ नसते. पण मुणगेकारांच्या संदर्भात हे इतक्या सहज घडेल असे स्वप्नातही वाटले नव्हते.
जे घडले त्याचे काय बरे - वाईट परिणाम होईल ते काळच ठरवेल. फक्त या सबंध प्रकरणात एकच दु;खाची बाब आहे ती म्हणजे आंबेडकरी माणसांच्या संदर्भात जे गृहीत धरले जाते त्याला या प्रकरणामुळे पुष्टी मिळाली. कोणी कुठे जावे हा ज्याचा त्यांचा विचार असला तरी तो ज्या समाजच प्रतिनिधित्व करीत असतो. तो समाज त्यामुळे पुढे येतो आणि त्या समाजाचा त्या समाजातील माणसांचा कुठलाही दोष नसताना बदनाम होतो. त्या समाजाला बदनाम करण्याचा ठेका तुंम्हाला कोणी दिला? माणस मोठीच असतात, पण आसक्तीची बाधा होताच
वाकून जातात नव्हे सरपटायला लागतात. जे याच्या पलीकडे जातात त्यांच्या मोठेपनासमोर आकाशालाही वाकावे लागते. अशी आकाशाला वाकवणारी माणस ज्या समाजाकडे असतात तो समाज आकाशापेक्षाही मोठा होतो. मी त्या माणसाच्या शोधात आहे!

Wednesday, September 29, 2010

शिखराचा चेहरा बदलला; पायव्याला आता बदलावेच लागेल!





सकाळ वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक आणि जेष्ठ्य आंबेडकरी लेखक उत्तम कांबळे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. ही ऐतिहासिक घटना मराठी सारस्वतांच्या प्रांतात घडली. याचा आनद तमाम पुरोगामी माणसाला झाला असला तरी ज्या पायावर मराठी सारस्वतांचा सगळा डोलारा उभा आहे तों पाया बदलल्याशिवाय किंवा नवी पायाभरणी झाल्याशिवाय नव्या सांस्कृतिक संवादाला आरंभ होणार नाही.
मुळात निवडणुकीच्या माध्यमातून या सर्वोच्च सांस्कृतिक पदावर आरूढ होता येते. हा एका प्रक्रियेचा भाग आहे. ही प्रक्रिया निश्चितच वादातीत नाही. या वादाला गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे. परंतु कोताही पर्याय अजून पुढे आला नाही. लोकशाहीत ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया मानली जाते. बहुमताच्या आधारावर ठरणारा निर्णय लोकशाहीत सर्वांनाच मान्य करावा लागतो. याचा अनेकांना फटका बसला पानतावणे सरांना या प्रक्रियेत यशस्वी होता आले नाही. कारणांचा गुंतावळा बाजूला सारून आपण आता हेच म्हणू शकतो की पानतावणे सराना ही प्रक्रिया मानवली नाही आणि ज्याना ती मानवणार नाही हे काळात होते ते या वाटेलाच गेले नाही विंदा,बाबुराव बागुल, रावसाहेब कसबे आदी काही सन्माननीय नवे आहेत. उत्तमराव या वाटेने गेले आणि यशस्वी झाले. केवळ यशस्वी झाले नाही तर दणदणीत विजयी झाले. भल्याभल्यांनी तोंडात बोटे टाकावी अशी ही घटना आहे.
पदामुळे माणूस मोठा होतो की, माणसांमुळे पदाची प्रतिष्ठा वाढते? हे सगळे प्रश्न उत्तमरावांच्या संदर्भात गैरलागू आहेत. ज्या विचारावर त्यांची निष्ठा तो विचार हे पद आणि प्रतिष्ठा यापेक्षा कितीतरी मोठा आहे. तो त्यांनी जपला म्हणूनच अत्यंत तळातल्या माणसांपासून तर शिखरावरच्या प्रतिष्ठित माणसांपर्यंत अगदी मनापासून प्रेम करणारी मंडळी त्यांच्या भोवती निस्वार्थपणे उभी आहेत. हे संबंध समाज जाणतो. मुळात प्रश्न आहे तो उत्तमरावानी निवडलेला हा मार्ग त्यांच्या विचाराचा वाहक ठरेल काय? याचे उत्तर आज जरी नेमकेपणाने देता येत नसले तरी उद्या मात्र या प्रश्नाचे उत्तर आपल्याला निश्चित पणाने द्यावे लागणार आहे.
अगदी शून्यातून उत्तमरावानी आपल्या प्रवासाला सुरुवात केली. वृत्तपत्र विकणाऱ्या पोरापासून तर सकाळच्या न्यूज नेटवर्क संपादक पर्यंतचा पत्रकारितेतला हा शिखरपर्यन्त्चा आणि एक मराठी लेखक म्हणून अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पद हा सर्वोच्च शिखरापर्यंतचा प्रवास पार करताना त्यांनी आपल्या विचाराशी कुठलीही तडजोड केली असेल असे आज तरी वाटत नाही. अगदी सांगलीचे स्वागताध्यक्षपद भूषवताना आणि आर आर आबा सारखा जवळचा स्नेही जपताना त्यांच्या वैचारिक निष्ठेला कधीच तडा गेला नाही. याउलट राजकीय पदांसाठी आंबेडकरी विचारवंतांचे झालेले कान्ग्रेसीकरण आणि स्वताला आंबेडकरी नेते म्हणवणाऱ्या माणसांनी सत्तेसाठी केलेले अभद्र लांगुलचालन हे आपण जेव्हा पाहतो त्या तुलनेत उत्तमरावानी जपलेली वैचारिक निष्ठा ही कितीतरी पटीने अधिक मोलाची आहे.
बदलत्या समाज वास्तवात बदलणारा माणूस आणि नव्या व्यवस्थेच्या निर्मितीसाठी स्वताला आणि समाजाला बदलाविणारा माणूस ही दोन्ही मानस प्रतिष्ठित असली तरी, बदलत्या समाज वास्तवात बदलणाऱ्या मान्सानापेक्षा नव्या व्यवस्थेच्या निर्मितीसाठी समाजाला बदलणारया माणसाची अधिक गरज समाजाला आहे. उत्तम कांबळे या नावाकडून ही अपेक्षा करणे गैर नाही. आज त्यांच्या रूपाने या प्रतिगामी शिखराचा चेहरा बदलला; पायव्याला आता बदलावेच लागेल!

Monday, August 16, 2010

कवितेच्या काळजातला पीळ निसटला....


आज वर्गात तास सुरु असताना सुर्वे गेल्याची दु:खद बातमी समजली आणि ; एक नि:शब्द स्तब्धता वर्गात पसरली, अगदी " नेहरू गेले त्या दिवसा सारखी " सगळेच चेहरे अगदी कोरे , भाव हरवलेले फक्त " सुर्वे गेले " एवढेच शब्द वर्गात घुमत राहिले,मराठी कवितेच्या काळजतला हा तळातल्यांच्या वेदनेचा पीळ असा अचानक निसटून गेला मराठी कवितेची सतत सलणारी , माणसाला त्याच्या दु:खाची जाणीव करून देणारी सल आता कायमची काळाच्या आणि या पोकळीच्या पल्याड निघून गेली ।

सुर्वे कवी होते त्याहीपेक्षा ते परिपूर्ण माणूस होते। एक अत्यंत संवेदनशील तेवढेच विनयशील असणारे सुर्वे त्यांच्या वाट्याला आलेल्या आयुष्याबाबत कुठलीही तक्रार न करता जगले। थोड़े थोडके नव्हे तर ८४ वर्षे ते जगले नातूच नव्हे तर पंतुनच्याही वाट्याला ते आले। मराठी माणूसच त्यांच्या कवितेचा चाहता नव्हता जगातल्या सगळ्या भाषेतल्या काव्य रसिकाना त्यांच्या कवितेने वेड लावले होते । माणसांबद्दल बोलणारे , माणसांमध्ये रमणारे, सतत माणसांचाच विचार करणारे सुर्वे कवितेच्या कुळाला नव्या मानव्याची कुस बहाल करू इच्छित होते । मूलत: कवी हा सामाजिक संपत्ति असतो। तो जे देतो ते इतराना देता येत नाही । तो संवेदना घेतो आणि मानुषता देतो, माणसाला नवा अर्थ बहाल करतो। सुर्व्यानी आपल्या कावितेतून ते दिले आहे ।

मराठी सहित्यविश्वाला या वर्षात जे धक्के बसत आहेत त्यातला आणखी हा एक मोठा धक्का आहे विंदा , भाल, चित्रे गेले आता सुर्व्याना निरोप देण्याची वेळ आपल्यावर आली आहे । सुर्व्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

Thursday, July 15, 2010

माणुसकीच्या अफाट धर्माची बाधा


खैरलांजी प्रकरणात मुम्बई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल अनपेक्षित नव्हता. तो यासाठी की तो तसाच यावा असेच प्रयत्न सगळ्याच यंत्रनेने मनापासून केले त्यात ते यशस्वी झाले याचा अर्थ ते जिंकले आणि न्यायासाठी प्राणपनाने लढणारे पराभूत झाले असे नाही. कोर्टाचा निर्णय हा न्याय असतो. हे आता केव्हाचेच कालबाह्य झाले आहे. तो केवल आरोपी आणि फिर्यादीना दिलेला एक निकाल असतो.
न्याय व्यवस्था हा लोकाशाहिताला अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे. माध्यम आणि विधिमंडल व् मंत्रीमंडलाची राजकारनाने काय अवस्था केली आहे. हे सगलेच जाणतात. केवल न्यायव्यवस्थेवरच समाजाचा थोडासा विश्वास होता तोही आता धुलित मिळाला आहे.या सगल्या व्यवस्थेत माणूस असतो तो जोपर्यंत निकोप असत नाही तोपर्यंत सगळी व्यवस्थाच कुचकामी आहे नेमके हेच खैरलान्जीच्या संदर्भात घडले. अत्यंत पूर्वग्रहदूषित भावनेने हे प्रकरण हतालले गेले
एका आन्धल्या पोराला, अजान पोरीला,पोराला आणि त्यांच्या आईला कृरतेने ठेचून थर मारले गेले त्यांची प्रेते नग्नावस्थेत गावाच्या बाहेर फेकली गेली. ज्यानी ते केले त्यांनाही पश्चाताप नाही यामागे केवल व्यक्तिगत कारण असू शकत नाही हे शेम्बड़े पोरही जानते पण न्यायालयाला कळत नाही.
म्हणून दलित अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यात हे बसत नाही. यात कुठलाही विनयभंग नाही.अंध मुलाला ठार करणे यात कुठलीही क्रूरता नाही जे गेले त्यांच्याबाबत दु;ख आहेच, पण ज्यानी हे घृणित कृत्य केले त्यांच्याही बाबत आमच्या मनात दयाभाव कमी नाही. असा आमचा माणुसकीचा धर्म अफाट आहे
गवई बंधू , पोचिराम काम्बले मनोरमा काम्बले, अशा असंख्य प्रकरणाला या आमच्या माणुसकीच्या अफाट धर्माची बाधा झाली आहे खैरलान्जिला तर या बाधेने अक्षरश; गिलून टाकले आहे
न्यायचे काहीही होवो ह्या आमच्या माणुसकीच्या धर्माची अफाटता कायम राहिली पाहिजे